कुणी रिकामा उगाच उठतो
चौकामध्ये उभा अचानक,
सामान्यांच्या प्रश्नांसाठी अडून बसतो.
खुळाच! त्याला ठाउक नाही,
ज्यांच्यासाठी प्राण पणाला लावुन लढतो-
शिवून त्यांचे पिंड
उडाला दूर कावळा!
आजकालचे पत्रकारही,
उगाच करती नसत्या थापा
दुष्काळाच्या नुसत्या गप्पा!
म्हणे उन्हाने लोकांच्या तोंडीचे पाणी
पळवुन नेले..
तर मग सांगा, आकाशाला नजर लावुनी
बसलेल्या त्या आईच्या
डोळ्यांतिल पाणी कुठून आले!
विदर्भातला शेतकरीही-
कशास मरतो तो निष्कारण!
कर्जामध्ये बुडूनसुद्धा उगवत नाही कापुस म्हणतो,
घरास अपुल्या बांधुन घेतो दैवाच्या फासाचे तोरण!
सगळे खोटे!
उगवत नाही कापुस तर मग,
या सा-यांच्या चिंतांचे,
(सरणावरती बसल्यागत),
चटके न लागता
कशी राहते उशी आमच्या बुडाखालती मऊ मुलायम?
No comments:
Post a Comment