अर्थाचा जहरी तीर-
असा गंभीर शब्द कवितेचा;
प्रतिभेचा नाजुक स्पर्श,
कोवळा हर्ष शब्द कवितेचा!

Friday 11 May 2012

उशी आमच्या बुडाखालती मऊ मुलायम


कुणी रिकामा उगाच उठतो 
चौकामध्ये उभा अचानक,
सामान्यांच्या प्रश्नांसाठी अडून बसतो.
खुळाच! त्याला ठाउक नाही,
ज्यांच्यासाठी प्राण पणाला लावुन लढतो-
शिवून त्यांचे पिंड
उडाला दूर कावळा!


आजकालचे पत्रकारही,
उगाच करती नसत्या थापा 
दुष्काळाच्या नुसत्या गप्पा!
म्हणे उन्हाने लोकांच्या तोंडीचे पाणी 
पळवुन नेले..
तर मग सांगा, आकाशाला नजर लावुनी
बसलेल्या त्या आईच्या 
डोळ्यांतिल पाणी कुठून आले!


विदर्भातला शेतकरीही- 
कशास मरतो तो निष्कारण!
कर्जामध्ये बुडूनसुद्धा उगवत नाही कापुस म्हणतो,
घरास अपुल्या बांधुन घेतो दैवाच्या फासाचे तोरण!

सगळे खोटे!
उगवत नाही कापुस तर मग,
या सा-यांच्या चिंतांचे, 
(सरणावरती बसल्यागत),
चटके न लागता 
कशी राहते उशी आमच्या बुडाखालती मऊ मुलायम?

No comments:

© Rutwik Phatak
all rights reserved