अर्थाचा जहरी तीर-
असा गंभीर शब्द कवितेचा;
प्रतिभेचा नाजुक स्पर्श,
कोवळा हर्ष शब्द कवितेचा!

Wednesday 31 March 2010

मृत्यु

कविवर्य विंदा करंदीकर गेल्यावर अनेक दिवस मनात विचार घोळत होते...ते यारूपाने उतरलेत. !

आज त्याच्या पार्थिवावर हार होता
त्याजसाठी मृत्युही सत्कार होता!

जीवना-मरणामधे ना द्वैत राही
अंतरी हा दिव्य साक्षात्कार होता

अंतरात्म्याची जणू लागे समाधी
लागला का थेट हा गंधार होता?

जिंकुनी झाले इथे दाही दिशांना
स्वर्गिचा जिंकायचा दरबार होता

वाहवा नुसतीच केली या जगाने
पेटला तो अन् पुन्हा अंधार होता.

Thursday 11 March 2010

नवी गझल

अजून मेघांत वीज जेव्हा थरारताहे
तुझ्या स्मृतीने तसाच मीही शहारताहे!

जरी तुझ्यावाचुनी फुले ही मलूल झाली,
तुझ्या स्मृतीने अजूनही मी तरारताहे!

अता तमाचे उगाच कारण नकोस सांगू
पहा पुन्हा हे नभांग सारे उजाडताहे!

असाच जातो जिथे दिसा नेतसे तिथे मी,
अजून दैवावरी तरी मी विसावताहे!

गुमान जो तो जुनाट वाटांवरून गेला
खुळाच तो जो इथे नवी वाट काढताहे!

फिरून आलो तमाम सारी पवित्रधामे
'उगाच गेलो' विचार आता दृढावताहे   !

कुणी म्हणे हा कवी अताशा लिहीत नाही
कुणास सांगू मनातले जे निखारताहे!
© Rutwik Phatak
all rights reserved