अर्थाचा जहरी तीर-
असा गंभीर शब्द कवितेचा;
प्रतिभेचा नाजुक स्पर्श,
कोवळा हर्ष शब्द कवितेचा!

Wednesday 18 May 2011

कविता

कधी अचानक
काळोखाच्या रानामध्ये मोर दिसावा
अन मग त्याच्या मागुन जाता
पुन्हा अचानक गायब व्हावा...
तशी मला ती दिसली होती.......
त्यानंतर मग
युगायुगांचे नाते अमुचे असल्यागत
मज वाटत होते,
पुन्हा पुन्हा त्या आठवणीने मनात माझ्या
दाटत होते...
अजूनसुद्धा
तसेच होते, भल्या पहाटे
रात्रीच्या गर्भातून जेव्हा
धुंद चांदण्याचे दव होते,
त्यावेळी मी पाहत असतो
कधी मनाला स्पर्शून गेल्या अदभुत, सुंदर...
कवितेची त्या
साखरस्वप्ने

काळं ऊन

धुळीने माखलेल्या चौरस खिडकीबाहेर
सर्वदूर पसरलंय
मावळतीचं काळं ऊन..
सगळीकडे एकसारखं,
अवकाशातल्या अनंत पोकळीप्रमाणे...
आयुष्यातल्या
सुखदु:खांच्या, श्वासानि:श्वासाच्या ओझ्याने काळवंडलेल्या
म्हातारीसारखा
क्षीण होतोय त्याचाही प्राण
तरीसुद्धा अंधाराशी अजूनही चालू आहे
त्याचा सौदा.

सूर्य पुरता क्षितिजाखाली गेलासुद्धा,
आता काही पर्याय नाही....
काळं ऊन भूत होऊन फिरत राहणार
रात्रीसुद्धा आता
आपल्या मनामनांतून!
© Rutwik Phatak
all rights reserved