अर्थाचा जहरी तीर-
असा गंभीर शब्द कवितेचा;
प्रतिभेचा नाजुक स्पर्श,
कोवळा हर्ष शब्द कवितेचा!

Friday 11 November 2011


आयुष्य म्हणजे 
आंधळ्यांची अधांतरी 
शर्यत असते!
सगळेजण धावत असतात 
तिन्ही मितींना 
आणि आपल्यालाच आपला 
आरंभबिंदू दिसत नसतो...
जाणवत असतात फक्त
इतरांच्या असंबद्ध हालचाली..
आणि कुठेतरी खोलवर 
ऐकू येत असतात, 
दूरवरून, 
काळाच्या टापांचे आवाज.....


आयुष्य म्हणजे 
आंधळ्यांची अधांतरी 
शर्यत असते!
सगळेजण धावत असतात 
तिन्ही मितींना 
आणि तरीही शेवटी 
सारेच पोचतात तिथे
जिथे दिशांचं काळाशी मीलन होतं...
मृत्यूपाशी!

Monday 7 November 2011

हॉस्टेलच्या बाल्कनीतून...


अनंत आकाशात 
असंख्य छिद्रांचे अस्ताव्यस्त 
जुनेरे पांघरून 
बिनघोर, गाढ झोपलीय
विलक्षण सुंदर, तेजस्वी निशा...


समोरच्या अफ़ाट, अथांग सागराचा
जीव उचंबळतोय 
तीस दिवसातून एकदा दिसणारा 
तिचा नितांत सुंदर, रेखीव चेहरा पाहण्यासाठी....


चंदेरी कडांचा एक शुभ्र ढग
लपवू बघतोय तिचा तो चेहरा 
आपल्या नितळ, तलम अस्तरामागे...


खवळलेल्या सागराच्या उत्तुंग लाटा
झेप घेताहेत अवकाशात
त्या अभ्रास दूर सारण्यासाठी.....
पण या मनस्वी रत्नाकराचे हात 
पोचत नाहीत कधीच त्या निरागस निशेपाशी!


आपल्या तेजाची, सौंदर्याची 
मुळीच जाणीव नसलेली ती निशा
तशीच गाढ झोपलीय आपलं जुनेरं कवटाळून...


समोरचा अफाट सागर आता 
विषण्णपणे टिपतोय 
तिच्या रूपाची, तेजाची असंख्य छोटी 
प्रतिबिंबे! 

© Rutwik Phatak
all rights reserved