अर्थाचा जहरी तीर-
असा गंभीर शब्द कवितेचा;
प्रतिभेचा नाजुक स्पर्श,
कोवळा हर्ष शब्द कवितेचा!

Thursday 11 March 2010

नवी गझल

अजून मेघांत वीज जेव्हा थरारताहे
तुझ्या स्मृतीने तसाच मीही शहारताहे!

जरी तुझ्यावाचुनी फुले ही मलूल झाली,
तुझ्या स्मृतीने अजूनही मी तरारताहे!

अता तमाचे उगाच कारण नकोस सांगू
पहा पुन्हा हे नभांग सारे उजाडताहे!

असाच जातो जिथे दिसा नेतसे तिथे मी,
अजून दैवावरी तरी मी विसावताहे!

गुमान जो तो जुनाट वाटांवरून गेला
खुळाच तो जो इथे नवी वाट काढताहे!

फिरून आलो तमाम सारी पवित्रधामे
'उगाच गेलो' विचार आता दृढावताहे   !

कुणी म्हणे हा कवी अताशा लिहीत नाही
कुणास सांगू मनातले जे निखारताहे!

2 comments:

AJ said...

चांगली वाटताहे.

Rutwik said...

अपूर्व, धन्यवाद!

© Rutwik Phatak
all rights reserved