अर्थाचा जहरी तीर-
असा गंभीर शब्द कवितेचा;
प्रतिभेचा नाजुक स्पर्श,
कोवळा हर्ष शब्द कवितेचा!

Tuesday, 9 November 2010

.......प्रसूती.......

सगळीकडे सामसूम
चेह-यावरती गंभीर भाव
खोलीबाहेर उभे सगळे
ईश्वराचे जपत नाव

कसं होईल? काय होईल?
काळजीमध्ये सगळेजण
छातीमधली धाक-धुक
थांबत नाही एक क्षण

सगळे असतात खोळंबलेले
तेव्हा हळूच उघडून दार
एक येतो दाढीवाला
कपाळावर आठ्या चार

काय झाले काय झाले
सगळ्यानी मग विचारता
दाढीवाला सांगतो कसा
प्रसवली मी 'कविता'!

Wednesday, 1 September 2010

दिशांची लावुनी दारे स्वत:मध्येच रुतलेला
असा गंभीर आताशा कवी माझ्यात भिनलेला

विचारांच्या अशा बेभान लाटा आदळाव्या अन
मतीच्या वादळाने सुन्न व्हावा देह हा सारा,
परंतू पावसापाठून ये मृद्गंधही तैसा
जणू ओंकारानादाने मनाचा धुंद गाभारा

कसे चित्तात अन वृत्तीत या अद्वैत साधावे
अनन्ताच्याच ध्यासाचा अनादी यज्ञ हा आहे!
क्षणांच्या आहुतीने चेतना ही तेवते आहे!

Saturday, 10 July 2010

काळाच्या पारंब्या

काही ओळी सुचून जातात. कुठूनतरी उडत उडत अचानक आपल्या हातावर येऊन बसलेल्या फुलपाखरासारख्या.
अशावेळी या ओळींना कवितेच्या साच्यामध्ये बसवायचं नसतं.
त्या मनोहर फुलपाखराकडे नुसतं बघत बसण्यातच खरा आनंद मिळतो!



मी अजूनही त्या वाटेवर घुटमळतो
अन अजूनही त्या आठवणींना स्मरतो
काळाच्या पारंब्यांच्या आडून आता
'तेव्हाचा मी' आताच्या मजला दिसतो!

Tuesday, 27 April 2010

माझी कविता

वासनांना अंत नाही पण मनाला खंत नाही-
बेरडे वैराग्य येण्या कोरडा मी संत नाही..

मी जसा बाहेरुनी आहे तसा आतूनही मी..
तोतया पोशाख घेण्याएवढा श्रीमंत नाही!

जे मनाला वाटते, पटते तसे बोलून टाके,
अक्षरे तोलावया मी थोर प्रज्ञावंत नाही!

मुक्तछंदाचा कवी मी शब्द शब्दा जोडणारा,
उमलती आर्या रचाया पात्र, मोरोपंत नाही

ते बघा कवितेकडे या नासिका मुरडून गेले..
का? म्हणे- 'रचनेत या दिसला कुठेच वसंत नाही!'

का इथे हे गीत मरणाचे तुझे गातोस वेड्या!
मी तुझ्या श्राद्धास येण्या जातिचा किरवंत नाही!

Wednesday, 31 March 2010

मृत्यु

कविवर्य विंदा करंदीकर गेल्यावर अनेक दिवस मनात विचार घोळत होते...ते यारूपाने उतरलेत. !

आज त्याच्या पार्थिवावर हार होता
त्याजसाठी मृत्युही सत्कार होता!

जीवना-मरणामधे ना द्वैत राही
अंतरी हा दिव्य साक्षात्कार होता

अंतरात्म्याची जणू लागे समाधी
लागला का थेट हा गंधार होता?

जिंकुनी झाले इथे दाही दिशांना
स्वर्गिचा जिंकायचा दरबार होता

वाहवा नुसतीच केली या जगाने
पेटला तो अन् पुन्हा अंधार होता.

Thursday, 11 March 2010

नवी गझल

अजून मेघांत वीज जेव्हा थरारताहे
तुझ्या स्मृतीने तसाच मीही शहारताहे!

जरी तुझ्यावाचुनी फुले ही मलूल झाली,
तुझ्या स्मृतीने अजूनही मी तरारताहे!

अता तमाचे उगाच कारण नकोस सांगू
पहा पुन्हा हे नभांग सारे उजाडताहे!

असाच जातो जिथे दिसा नेतसे तिथे मी,
अजून दैवावरी तरी मी विसावताहे!

गुमान जो तो जुनाट वाटांवरून गेला
खुळाच तो जो इथे नवी वाट काढताहे!

फिरून आलो तमाम सारी पवित्रधामे
'उगाच गेलो' विचार आता दृढावताहे   !

कुणी म्हणे हा कवी अताशा लिहीत नाही
कुणास सांगू मनातले जे निखारताहे!

Thursday, 11 February 2010

एक नवीन कविता... माझीच.

सांगू नको रे माणसा अपुली घराणी
जाते पुन्हा ती माकडांपाशी कहाणी!

ऐशी न पूर्वी पाहिली मी जात होती
या चंदनाने शेवटी झिजल्या सहाणी!

गर्दीत होतो गाढवांच्या बैसलेला
माणूस होतो पण तरी ठरलो अडाणी!

आता ढगांचा राहिला कोठे भरोसा
या पावसाने आणले डोळ्यांत पाणी!

मी वास्तवाशी झुंजण्या गेलोच नाही
अमुच्याकडे खोट्या कथा, खोटीच गाणी!

या आमच्या गावात नाहित आडवाटा
(सा-याच जाती थेट घेऊनी स्मशानी!)


© Rutwik Phatak
all rights reserved